प्रतिक मयेकर
बोईसर: यशवंत सृष्टी परिसरात घडलेल्या भीषण अपघातात एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे घडला, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे. सदर डिव्हायडर न पाहिल्यामुळे वाहन जोरात धडकले आणि दुर्दैवी व्यक्तीने आपले प्राण गमावले.
सदर ठिकाणी अंधार, रेडियमशून्य डिव्हायडर आणि कोणताही चेतावणी फलक नसल्यानं हा अपघात टाळता आला नाही. या दुर्घटनेनंतर सामान्यत: प्रशासन तत्काळ हालचाल करतं अशी अपेक्षा असते. पण इथे नेहमीप्रमाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एमआयडीसीचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हते.
यंत्रणांची झोप लागली असताना, स्थानिक युवकांनी पुढाकार घेतला आणि स्वखर्चाने उपाययोजना केली. विशेष म्हणजे राहुल सिंग, शुभम सिंग, मंगेश नागणे, अमोल गर्जे, राम शुक्ला, आकाश सिंग आणि संभाजी शिरसाट, साई संखे या तरुणांनी पैसे गोळा करून लोखंडी खांब उभारला आणि त्यावर रेडियम पट्टे लावले, जेणेकरून रात्री वाहनचालकांना तो भाग स्पष्ट दिसेल.
या कार्यात कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही. “अपघात घडतो, माणसं मरतात, पण अधिकारी खुर्चीतून हलत नाहीत. आम्हीच जर हे सगळं करायचं असेल, तर सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की काय करतं?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
स्थानिकांनी मागणी केली आहे की, प्रशासनाने तात्काळ डिव्हायडरवर योग्य प्रकाशव्यवस्था, सतर्कता फलक व ठळक रेडियम पट्ट्यांची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. अन्यथा पुढील अपघातांना जबाबदार कोण, हा प्रश्न प्रशासनाला चुकवता येणार नाही.
प्रतिक्रिया
अपघाताने आम्हा सर्वांच्या मनाला हादरा बसला होता. काहीतरी तात्काळ करायला हवं, ही भावना मनात ठाम होती. आम्ही युवकांनी मिळून स्वतःच्या खिशातून पैसे जमा केले आणि लगेचच उपाययोजना राबवली. मात्र आम्ही हे सर्व काही एकटेच केलं असं मुळीच नाही म्हणायचं.” “खैरेपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच विवेक वडे आणि त्यांच्या सहकारी मित्रवर्गाने आम्हाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन दिलं. त्यांचा पाठिंबा आणि सकारात्मक सल्ला आमच्यासाठी खूप मोठा आधार ठरला. प्रशासन झोपलेलं असताना, लोकप्रतिनिधी आणि नागरिक एकत्र येऊनही परिस्थिती बदलू शकते, हे आम्ही अनुभवले.”
राहुल सिंग,नागरिक
प्रतिक्रिया
एकीकडे अपघात होतो आणि माणूस प्राण गमावतो, तर दुसरीकडे जबाबदार अधिकारी खुर्चीतच बसून राहतात — ही शोकांतिका नाही का? हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे, पण प्रशासन झोपलेलं असताना युवक पुढे आलेत, ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायक आहे, पण तितकीच लाजिरवाणीदेखील आहे प्रशासनासाठी.”
अमोल गर्जे,सामाजिक कार्यकर्ते