Palghar Nargrik

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शोकांतिका! एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू – मृत्यूसमोर हातपाय मारत होती एक लहानगी…

प्रतिक मयेकर 

बोईसर, वाडा-खडकोना परिसर | ११.३० AM: आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. मनोर गेट हॉटेलसमोर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी कारला झालेल्या दुहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू, आणि एक लहान मुलीसह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एक कंटेनर समोरून, आणि मागून येणाऱ्या अवजड वाहनाने मधोमध चिरडलेली ही कार म्हणजे फक्त धातूचा ढीग नव्हे – ती एका कुटुंबाच्या स्वप्नांची थडगी ठरली.

मृत्यूच्या घशात अडकलेले तीन जीव

मृतांमध्ये ग्लोरिया वलेस (७३), क्लायटोन वलेस (४३), आणि फबोलिया वलेस (४५) यांचा समावेश आहे. एका सुखासमृद्ध जीवनासाठी जात असताना, एका क्षणात त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला. गाडीतील एका लहान मुलीच्या किंकाळ्यांनी अवकाशही हादरला, पण नियतीचं फास थोडा वेळ जरी थांबला, तरी मृत्यूचा निर्णय अंतिम ठरला.

“चिरडल्या गेलेल्या माणसांबरोबर प्रशासनाची झोपही चिरडून गेली पाहिजे!”

हा अपघात अचानक झाला नाही. तो प्रशासनाच्या दुर्लक्षाची, वाहतूक नियंत्रणाच्या अपयशाची, आणि महामार्गावरील बेफाम वेगाच्या टोकाची फळं आहे हायवेवर दर दिवशी गाड्यांचा वेग वाढतोय, पण जबाबदारी शून्यावरच आहे. वाहतूक पोलीस कुठे होते? कंटेनर आणि अवजड वाहनांनी कशी बिनधास्त स्पर्धा चालवली? आणि सर्वात महत्त्वाचं – अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळायला इतका वेळ का लागला?

“अपघात होत नाहीत – ते घडवले जातात!”

ह्या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रशासनाच्या कामगिरीवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. सीसीटीव्ही नाही, स्पीड कंट्रोल नाही, ट्रॅफिक गार्ड नाही, आणि अपघातानंतर तत्काळ रेस्क्यू टीमही नाही! मग या महामार्गाचा उपयोग नेमका कुणासाठी आणि कशासाठी?

शेवटची हाक – लहानग्या डोळ्यांतून वाहणारे प्रश्नआजही एका लहान मुलीला हा प्रश्न सतावत असेल –”माझं कुटुंब कुठं गेलं? कोण जबाबदार आहे?”

Leave a Comment