Palghar Nargrik

गांजाच्या तस्करीवर मोठा झटका! विक्रमगड जवळ सापळा रचून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त – दोन नाशिककर आरोपी अटकेत

प्रतिक मयेकर 

विक्रमगड: पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखा, पालघर आणि विक्रमगड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने गांजाच्या तस्करीवर धडक कारवाई करत तब्बल ७ लाख ५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कारवाई दि. १३ जून २०२५ रोजी सायंकाळी ८.४५ वाजता विक्रमगड-जव्हार रोडवरील यशवंतनगर हद्दीत करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून गुजरात क्रमांकाची वेरणा कार (GJ-15/CO-4644) अडवली. तपासणीदरम्यान कारच्या डिक्कीतून १०.२५८ किलो वजनाचा, २ लाख ५ हजार १६० रुपये किमतीचा गांजा आढळून आला.

 

या प्रकरणात नाशिक येथील सतिश लक्ष्मण वाघ (वय ५२) आणि सागर सोमनाथ बलसाने (वय २९) यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तस्करीसाठी वापरलेली ५ लाख रुपये किमतीची वेरणा कार देखील जप्त करण्यात आली आहे.संपूर्ण मुद्देमालाची किंमत ७ लाख ५ हजार १६० रुपये इतकी आहे.या प्रकरणी विक्रमगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८३/२०२५ नुसार NDPS कायदा कलम ८(क), २०(ब)(II) अंतर्गत दि. १४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना १७ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या कारवाईचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित गोळे हे करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, तसेच पोलिस निरीक्षक प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडली. कारवाईत सहा. पो. निरीक्षक रविंद्र पारखे, पोउनि रविंद्र वानखेडे, गोरखनाथ राठोड, भगवान पाटील, आणि स्थानिक गुन्हे शाखा तसेच विक्रमगड पोलीस ठाण्याचे अंमलदार सहभागी होते.

Leave a Comment